केंद्राने जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावली लावून आधीच वाढलेल्या महागाईत आणखी भर घातली आहे. सर्वसामान्य माणसाला दोन वेळचे जेवण मिळवणे ही कठीण झाले आहे, असा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करीत निदर्शने केली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रोखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी बॅरिकेटिंग केले होते. कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेट हटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांची पोलिसांशी झटापट झाली.
देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. बेरोजगारी महागाई यासारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखवून चूप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.