मुंबई: राज्यात मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची शुक्रवारी मुंबईत भेट होणार आहे. मात्र, या भेटीपूर्वी राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कामगिरीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेने गृहखाते हे राष्ट्रवादीकडून काढून आपल्या नेत्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तत्परतेने कारवाई करत नाहीत, यामुळे शिवसेना नाराज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. त्यामुळेच आता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी गृहमंत्रालय आपल्याकडे घ्यावे, असा मतप्रवाह शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रस्ताव मान्य करेल का, याबाबत शंकाच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांमधील वर्षा बंगल्यावरील आजच्या भेटीत यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
गृहमंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले होते. महाराष्ट्रातील गृहखात्याने कडक होण्याची गरज आहे. आपण आस्ते कमद भूमिका घेत असाल तर आपल्याभोवतीचा फास आवळत आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला दमदार पावले उचलावी लागतील नाहीतर रोज एक खड्डा खणला जात आहे, ही बाब ध्यानात ठेवावी, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या विधानांचा रोख गृहखात्याच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.