महाड | कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पडणाऱ्या धो-धो पावसामुळे अनके ठिकाणी दरडी कोसळून निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे रविवारी चिपळूणच्या दौऱ्यावर होते.
रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीची पाहणी काल केंद्रिय मंत्री नारायण राणे केली. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते होते. मंत्री नारायण राणे, यांनी काल तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आमचं सर्व काही पुरात वाहून गेलं आहे. आमचं कंबरडं मोडलं आहे. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्राज जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो, असं या व्यापाऱ्यांनी राणेंना सांगितलं.