मुंबई |होळीच्या पार्श्वभूमीवर ठकरे सरकारकडून मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली असून रात्री १० च्या आत होळी पेटवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात भाजपा आमदार राम कदम यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’महाराष्ट्रसरकारचा एवढा टोकाचा हिन्दू सणांना विरोध का?आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत. आहो तुम्ही घाबरट असाल हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात.’
दरम्यान, तुमच्याच भाषेत…काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच’, असे राम कदम म्हणाले आहेत. त्यामुळे आता याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक होण्याचे चित्र दिसून येणार आहे.