उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर ठाकरे गटातील नेते त्यांना वारंवार गद्दार म्हणून हिणवत आहे.
तसेच विरोधक शिंदे गटावर ५० खोके घेतल्याचा आरोपही करीत आहेत. यावरही अंधारे यांनी भाष्य केले. मी खोक्यांवर कधीच बोलत नाही. मला त्याचे काही घेणंदेणं नाही. गद्दारी केलेल्या माणसांनी फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच विश्वासघात केला नाही तर मतदारांचाही केला. तिकडे गेले आणि गब्बर झाले. जागा कशी घेतात? पैसे कुठून येतात? असा सवाल अंधारे यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. किरीट सोमय्या कष्टाळू आहेत. वाशिमला गेले. पुण्यात मार खाल्ला. किती कष्ट. त्यांना मंत्रिपदच द्यायला हवं. केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि पंकजा मुंडे यांना भाजपने काय दिलं ? असा उलट प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. बाहेरची लेकरं येतात त्यांना आंगडंपांगडं. स्वत:ची लेकरं मात्र उपाशी. भाजपचं म्हणजे बाहेरची बनारसी आणि घरची उपाशी, असा शब्दात अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
आमच्याकडून जे 40 आमदार गेले. त्यांचा बायोडेटा चेक करा. त्यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा पक्ष बदलले असतील. सगळ्या पक्षांमध्ये उताणे पडल्यावर ते आमच्या पक्षात आले. लढले आणि जिंकले. आता आमची बिल्ली आम्हालाच म्याव करतेय. तिकडे जाऊन नाचत आहेत. त्यांना आता नाचण्यासाठी लग्नातच बोलवा, अशी टीकाही अंधारे यांनी केली. जळगावचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली. चिमण आबांचं वय 73 आहे. त्यांना सभेत उचलून धरावं लागतं. तिथे गेले की थुईथुई करतात. हा चमत्कार कशाचा आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.