गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोक सदरातून बंडखोर आमदार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात आणि जातात. पक्ष संघटन ठाम असते. फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील. महाराष्ट्र हे स्वीकारणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करीत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत, हे शिंदे यांनीच उघड केले. भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली.
सुरतमधील ‘मेरिडियन’ हॉटेलात शिवसेनेच्या आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ‘फुटीर’ आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली. सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमानाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली.
या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था करण्याचे कारण काय? दुसरे महत्त्वाचे, बिऱ्हाड गुवाहाटीत पोहोचल्यावर काही आमदार मुंबईतून निघाले ते थेट गुवाहाटीला न जाता आधी सुरतला गेले. तिथून गुवाहाटीला गेले. ते रहस्य काय? सुरतच्या भूमीवर असा कोणता मंत्र या आमदारांना देण्यात आला? जे आमदार नंतर गुवाहाटीला गेले, त्यांनाही ‘व्हाया’ सुरत जावे लागले. हा संशोधनाचा विषय आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.