राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राणे कुटुंबीय सोडत नाही. त्यात मंगळवारी ठाणे येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
ठाणे शहराला राज्य सरकारकडून येणे बाकी असलेले पैसे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच असून त्यांनीच ठाणेकरांचे पैसे अडवले असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. हे पैसे शिंदे यांनी दिले तर ठाण्याचा चांगला विकास होईल असे राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.
राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यावर नारायण राणे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी शिंदेंवर वरील टीका केली. शिंदे यांच्याकडे राज्याचे नगरविकास खाते आहे. महापालिकांना त्यांच्या हक्काचे पैसे देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. शिंदे यांनीच ठाणेकरांचा निधी अडवला आहे. त्यामुळे ते सर्व पैसे त्यांच्या कडेच आहेत, असे राणे म्हणाले.