लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. बुधवारी पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
दोन दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते घरी परतले होते. परंतु, पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे बुधवारी पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. लातूरच्या माजी खासदार रुपाताई निलंगेकर या त्यांच्या सूनबाई, तर राज्याचे माजी मंत्री आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू होत. बुधवारी दुपारी निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
91 व्या वर्षी त्यांनी कोरोनावर मात करत त्यांनी सर्वांना सुखद धक्का दिला होता. दोन दिवसांपूर्वीच ते कोरोनामुक्त झाले होते. त्यांना मधुमेह, रक्तदाब, किडणीचा त्रास त्यातच कोरोनाची लागण झाली होती. मात्र डाॅक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागातील विलगीकरणात ठेवले होते. त्यांनी मोठ्या जिद्दीने कोरोनावर मात केली होती.
या काळात त्यांच्या तब्येतीबद्दल माननीय प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी विचारपूस व सहकार्य केले तसेच कार्यकर्ते ,निलंगेकर परिवारावर सतत प्रेम करणारे यांनी दादा साहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाला अभिषेक करणे, प्रार्थना करणे ,साकडे घालने, या त्यांच्या आपुलकीने आशीर्वादाने दादासाहेब कोरोना आजारातुन बरे झाले ,या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो निलंगेकर परिवारावर ,असेच प्रेम अशीच आपुलकी ,भविष्यातही राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो’. अशी फेसबुक पोस्ट अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. 1985-86 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर 1990-91 या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला. तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही.