कोल्हापूर | जयप्रभा स्टुडिओचे कायमस्वरूपी अस्तित्व ठेवण्याबरोबरच तेथे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मारक उभे करण्याबाबत आग्रही असल्याचा दावा पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी करणे ही कोल्हापूरकरांना तसेच चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.मात्र दोघांनीही केवळ आपल्या भावना व्यक्त करुन न थांबता या भावना प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास जपला जाईल.
कोणत्याही प्रकरणात राज्यकर्ते अथवा लोकप्रतिनिधी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. राज्यकर्त्यांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात हा इतिहास आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली नाही तर मी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असा निर्धार केला.त्यांनी २०१४ साली ही योजना मंजूर करून आणली, ती आता अंतिम टप्प्यात आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेसुद्धा धडाडी असणारे राजकीय नेते आहेत. त्यांनी शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी, रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी १५ कोटींचा निधी मागच्या काही महिन्यांत मंजूर करुन आणला आहे.
शहराचा विकास हाच ध्यास दोघांनी घेतला आहे.म्हणूनच जयप्रभा स्टुडिओ आणि लता मंगेशकर यांचे स्मारकासंदर्भात त्यांनी केलेली वक्तव्य तमाम चित्रपटप्रेमी तसेच रंगकर्मींना आश्वासक आहेत. आंदोलने ही होत राहतील, त्यातील सहभागही महत्त्वाचा राहील. परंतु त्याही पलीकडे जाऊन काही पर्याय घेऊन सरकारच्या दरबारी जाऊन मार्ग काढला तर त्यातून भविष्यकाळासाठी एक चांगले कार्य होणार आहे.रंकाळा तलावाचे संवर्धन व संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हेरिटेज वास्तू असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे आहे. त्यामुळे याही गोष्टीला महत्त्व द्यावे अशी रंगकर्मींची भूमिका आहे.