ग्लोबल न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येत्या रविवारपासून (दि.28) रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाच्या वतीने याबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत आहे.
त्यामुळे संपूर्ण राज्यात येत्या रविवारी रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असे मुख्यमंत्री म्हणाले.
#CORRECTION | Night curfew to be imposed in Maharashtra from the night of 28th March. A separate order in this regard will be issued by the Disaster management and rehabilitation department soon: Maharashtra's Chief Minister Office pic.twitter.com/wq4cUTgZrs
— ANI (@ANI) March 26, 2021
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मला लॉकडाउन लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय? अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे.
हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाउन लावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.