चिपळूण | मुंबई, ठाणे, कोकणासह कोल्हापूरमध्ये पावसाने थैमान घातले असून चिपळूणमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घरं आणि बाजारपेठा पाण्याखाली गेल्याने बोटींच्या मदतीने पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. तर बचावकार्य अधिक वेगाने व्हावे यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येणार आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे अनेक ठिकाणी गावंच्या गाव पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये पूराच्या पाण्यात ५००० हून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. यासाठी स्पेशल रेस्क्यू प्लॅन तयार केला आहे. रत्नागिरीहून स्पीड बोटी रवाना झाल्या असून कोस्ट गार्डच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे.
तर दुसरीकडे शहापूर तालुक्यातील नद्या नाले दुभडी भरुन वाहत आहेत. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच वीजप्रवाह खंडीत झाला आहे. वाशिंद रेल्वे पुलाखाली पाणी असल्याने येथील वाहतूक पुर्णपणे बंद झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.