मागच्या काही महिन्यापासून केंद्रीय यंत्रणांची राज्यातील अनेक नेत्यांवर धडक कारवाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केली.तर शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक यांना केंद्रीय तपास यंत्रणेने अर्थात ईडीने नोटीस बजावली. यातच आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेलेले मात्र, नंतर ठाकरे गटात परतलेले आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
देशमुख म्हणाले की, फक्त मराठी माणूस केंद्रीय तपास यंत्रणांच्या आणि त्यातही ईडीच्या रडारवर आहे. यामागे भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांचे कारस्थान आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. यावेळी सुरत येथून माघारी परतल्याच्या प्रसंगावरही नितीन देशमुख यावेळी बोलले. मी तेव्हा नागपुरात कसा पोहोचला हे मलाच माहीत आहे. तेव्हा सुरतला मला हृदयविकाराचा झटका आल्याचे कुणी म्हणाले,
तसेच कुणी माझ्या घातपाताच्या अफवा पसरवल्या, असे नमूद करताना हृदयविकाराचा झटका आला असेल तर मी तीन दिवसांत नागपुरात कसा पोहोचेन, असा सवाल करत नितीन देशमुख नशेत धुंद होते, अशा बातम्या गुजरातमधील वर्तमानपत्रात छापून आणल्या गेल्या, पण त्यात काहीही तथ्य नाही. माझी डीएनए तपासणी करा. त्यात जर नशा करत असल्याचे आढळले तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान देशमुख यांनी दिले.
आपल्याकडे सैन्य अफाट आहे, ही निवडणूक युक्तीने लढवली पाहिजे सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो आमच्या बॅनरवर लागले आणि आमचे मताधिक्य कमी झाले. आपल्याकडे सैन्य अफाट आहे, पण आपल्याला ही निवडणूक युक्तीने लढवली पाहिजे, असे मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.