मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने काढलेल्या मोर्चावर आता विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यातच आता काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या जुन्या विधानावर टोला लगावला आहे.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण सोडवू असं म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आमच्या हातात सूत्र द्या, तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन देतो, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरुन बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला.
सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.