मुंबई | राज्यात गाजत असलेल्या तांदूळ घोटाळ्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले असून याची व्याप्ती पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत गेली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेद्वारे मिळाणाऱ्या तांदळात घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. या घोटाळ्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहेत, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. तसंच, या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जर या घोटाळ्याची चौकशी झाली तर अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता फडणवीसांनी लावलेल्या आरोपांना सत्ताधारी पक्ष काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.