कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे. :ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या, असा इशारा शेट्टी यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतीला सलग 10 तास दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले जात आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी ट्विट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे .
माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला असून त्या ट्विटमधील फोटोमध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही- अजित पवार, उपमुख्यमंत्री असे म्हटले आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी, ‘एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,’ असे म्हटले आहे.