पुन्हा एकदा ठाकरे गटाचे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे आपल्यासोबत जे आले आहेत ती म्हणजे सत्तेसोबत आलेली सूज आहे. निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. आपल्यासोबत कुणीही आलेलं नाही हे एकनाथ शिंदे यांना कळून चुकलं आहे. त्यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
आपल्या बरोबर आलेले लोक म्हणजे सत्तोसोबत आलेली सूज आहे. परंतु जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते जागेवरच आहेत हे कळल्यामुळेच आणि मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारवर केली आहे, रत्नागिरीत भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, ज्या ४० आमदारांनी विश्वासघात करून उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं, त्या ४० आमदारांच्या मतदारसंघात आमचे नेते आदित्य ठाकरे गेले त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला आलेले लोक आणि बीकेसीवर आणलेले लोक यातला फरक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. एवढंच काय आमच्या महाप्रबोधन यात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
आम्हाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांना कळून चुकलं आहे की आपल्याबरोबर कोणीही आलेलं नाही, आपल्या बरोबर आलेली आहे ती सत्तेबरोबर आलेली सूज आहे, परंतु जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते जागेवरच आहेत, हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे, त्यामुळे आम्हाला थांबविण्यासाठी आमच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे.