मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांविरधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अशातच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ राजीनामा सत्र सुरू झाले आहे. डोंबिवलीतील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह 14 शिवसेना आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
राजेश कदम यांनी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांना डोंबिवली शहराजे उपजिल्हाप्रमुख पद देण्यात आले होते. परंतु, कदम यांनी आज या पदाचा राजीनामा दिला आहे. “हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारासाठी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार पुढे नेण्यासाठी आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचलले आहे. त्या वाटचालीस आम्ही सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे राजेश कदम यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजीनामा नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. या आधी ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी राजीनामा दिला आहे. त्यांतर आता डोंबिवलीतील 14 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.दरम्यान, राजेश कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.