राज्यात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातलं आहे. त्यातच जी जनावरं रस्त्यावर मोकळी सोडून दिली आहेत, अशा जनावरांना एखादी स्वयंसेवी संस्था संभाळत असेल तर त्या जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभाग करेल अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. लम्पीच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेऊन दूध तुटवडा असल्याची अफवा कोणी पसरवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सायबर क्राईम अंतर्गत कारवाई केली जाईल असे विखे पाटील यांनी सांगितले.
लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या स्तरावर जो एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तो कसा खर्च करायचा याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ हे घेतील. त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. लम्पीच्या प्रादुर्भावाचा गैरफायदा घेऊन दूध तुटवडा असल्याची अफवा कुणी पसरवत असेल तर अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, कोरोना काळात जसे कोरोना योद्धा होते तसेच लम्पीचा पार्श्वभूमीवर ‘लम्पी योद्धा’ तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे विखे पाटील म्हणाले. तसेच ‘माझे पशुधन माझी जबाबदारी’ या धर्तीवर पशुपालकांनी काम करणं गरजेचं आहे. सोबतच पशुसंवर्धन विभागाला मनुष्यबळ कमी पडणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. काही जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून खासगी डॉक्टरांची मदत घेतली जात असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.