नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्र्यांनी आपल्या मंत्री पडला राजीनामा दिला आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना सुद्धा आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉ. हर्षवर्धन यांना मोदी सरकारकडून ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचं म्हटलंय. ‘बिचारे डॉ. हर्षवर्धन… उच्च स्तरावरच्या स्मारकीय अपयशासाठी एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं’ असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे.
करोना संसर्गाच्या काळात आरोग्य व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारनं अनेकदा स्वत:ची पाठ थोपटून घेतली. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे सरकारवर हल्ले सुरू राहीले. देशात ऑक्सिजनची कमतरता, औषधांचा काळाबाजार, लसींची कमतरता, उपचार आणि आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक मुद्यांवर डॉ. हर्षवर्धन विरोधकांच्या निशाण्यावर राहिले. त्याचमुळे, डॉ. हर्षवर्धन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत, असं म्हटलं जातं आहे.