मुंबई | दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील बाजारामध्ये पुन्हा एकदा गर्दी जमू लागली आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीविरोधात लढत असून अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसून कोरोना पसरू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आज कोरोनाच्या महामारीशी लढण्यामध्ये कोरोना लसीकरणाचा मोठा वाटा असला तरीही मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग महत्वाचे आहे. मात्र याचा विसर नागरिकांना पडत असल्याचे समोर आले आहे. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये दिवाळी व इतर सणांच्या निमित्ताने बाजारामध्ये खरेदीसाठी झुंबड उडत असून सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे.
तर दुसरीकडे मास्क व सॅनिटायझरच्या विक्रीमध्ये सुद्धा कमालीची घट आली असून आपण सर्वजण नकळतपणे तिसऱ्या लाटेकडे जात तर नाही ना याचाही विचार झाला पाहिजे. या विषयी तज्ज्ञांनी माहिती देताना ते म्हणाले की, आज कोणत्याही बाजारामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी, त्यात वाहनांची कोंडी तसेच फेरीवाल्यांची गर्दीत भर पडत असून सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा विसर नागरिकांना पडला असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. याशिवाय तिसरी लाट रोखताना नागरिकांनाही आपलं कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अनावश्यक घराबाहेर पडणं, मास्क वापरणे हे पाळावं लागेल. काही गोष्टींसाठी सरकारला जबाबदार धरताही येईल पण त्याचे परिणाम मात्र आपल्या स्वतःला भोगावे लागतात. त्यामुळे नागरिक म्हणून कोरोनाच्या नियमांचे व आपल्या कर्तव्यांचं पालन गरजेचे आहे.