पुणे | छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान, अफजलखान यांच्या कुळातीलच असावेत. आता धरणात मुतणारे आता इतिहासात मुतायला लागेल आहेत. कदाचित तुम्ही पवार नसला, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते, अशा शब्दात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली.
रविवारी पुण्यात लाल महाल ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा या मार्गावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी देसाई बोलत होते. या मोर्चात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, भीमराव तापकीर, तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर यांच्यासह तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, मिलिंद एकबोटे, निवृत्त पोलीस अधिकारी भानू प्रताप बर्गे हे सहभागी झाले होते.
अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून टीका केली होती. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी मोर्चेही निघाले होते. आज पुण्यातही या आणि धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद अशा विविध मुद्द्यावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, यावेळी बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, हिंदू धर्माचे रक्षण आपण केले पाहिजे ही भावना आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल पण देश आणि धर्माशी तडजोड करणार नाही. आता आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण आराध्य दैवत मानतो आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल राजकारण होते हे दुर्दैवी आहे. आपण हे सहन करावे लागलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.