विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात पोहचताच थेट आरएसएस’चे मुख्यालय गाठून संरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता एका नव्या चर्चेला राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरवात झालेली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा फडणवीसांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. आधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली असे त्यांनी बोलून दाखविले होते.
यावेळी सामनामधून करण्यात आलेल्या टिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा फडणवीस म्हणाले की, जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे असा टोला लगावला होता.