राज्यात सध्या मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला पावसाने झोडपून काढले आहे. याच परिस्थितीचा आढावा सरकारकडून घेण्यात आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची भेट घेत असून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. यावेळी पलूस कडेगाव मतदार संघाचे आमदार आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम सुद्धा उपस्थित आहे.
अजित पवार कोल्हापूर, सातारा आणि सांगली अशा तिन्ही जिल्ह्यांना भेट देणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवारांना कोल्हापूर दौरा रद्द करावा लागला आहे. दरम्यान अजित पवारांनी सांगलीतून दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी भिलवडी परिसरातील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेटी देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला व परिसराची पाहणी केली.
पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे? याची अजित पवारांनी माहिती घेतली. यावेळी त्यांनी तेथील कुटुंबाकडे आपुलकीने किती मुलं, मुली आहेत अशीही विचारणा केली. भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
सांगली जिल्ह्यातील भिलवडी परिसरामधील पूरग्रस्त भागाला, स्थलांतरितांच्या निवारा केंद्रांना भेट दिली. सभोवतालच्या परिसराची पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधला; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याबाबत माहिती घेतली. pic.twitter.com/194bqLFdnN
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2021