मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभांचा घडाका लावला आहे. गुढीवाडवा मेळावा, उत्तर सभा व औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला फैलावर घेतलं. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेना व राष्ट्रवादीला धारेवर धरलं.
राज ठाकरे यांच्या तीन सभांमध्ये तुफान फटकेबाजी केल्यानंतर राज ठाकरे 21 मे रोजी पुण्यात सभा घेणार होते. संपूर्ण राज्याचं लक्ष या सभेकडे लागलं असताना पुण्यात पावसाच्या शक्यतेमुळे राज ठाकरेंची सभा रद्द झाली. मात्र पावसामुळे रद्द झालेल्या राज ठाकरेंच्या सभेवरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं आहे.
पावसाचे कारण देऊन मैदान सोडले
भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले
अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.@mnsadhikrut @ShivSena— Deepali Sayed (@deepalisayed) May 18, 2022
या संदर्भात त्यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. “पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले”, अशा खोचक शब्दात दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. राज ठाकरेंची 21 मे रोजी पुण्यात होणारी सभा रद्द झाली आहे. मात्र, राज ठाकरे आता कुठे सभा घेणार याबद्दल आज मनसेकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.