नवी दिल्लीमध्ये कारखाली आलेल्या 20 वर्षीय अंजली सिंग या तरुणीला चालकाने तब्बल 12 किलोमीटर फरपटत नेल्याने या अपघातात तिचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता.दरम्यान, या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 20 वर्षीय अंजली सिंग या तरुणीच्या कुटुंबीयांच्या मदतीला आता बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच, अभिनेता शाहरुख खान धावून आला आहे. शाहरुखच्या ‘मीर फाऊंडेशन’कडून अंजलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली असून शाहरूह खान याच्या या कृत्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.
अंजली ही तिच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. तिची आई सध्या डायलिसीसवर आहे. दोन बहिणी आणि दोन भावांचंही पालनपोषण ती करत होती. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हापासून अंजली घर चालवत होती. मात्र, आता अंजलीने देखील या आपल्यातून निरोप घेतला आहे. आणि अशापरिस्थितीत मीर फाऊंडेशनने तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.