अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. यावेळी रेड्डी यांच्या निलंबनाचा मुद्दा रेटून धरला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आले.
हरीसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार बाला याला अटक केल्यानंतर तीन दिवसांचा पीसीआर मिळाला होता. पीसीआर संपल्यानतर सोमवारी त्याला पुन्हा कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला प्रथम न्यायाधीशानी 30 मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीपाली चव्हाण यांना विनोद कुमार यांनी त्रास दिला होता. याबाबतची तक्रार रेड्डी यांच्याकडे असतांना त्यांनी कारवाई न केल्याचा आरोप आहे. भाजपने हे प्रकरण लावून धरले आहे. आज, मंगळवारी अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयात भाजपने ठिया आंदोलन केले. रेड्डी यांच्या निलंबन व अटकेची मागणी करण्यात आली .
यादरम्यान अमरावतीच्या पालकमंत्री तथा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रेड्डीच्या अटकेसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आज दुपारी श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले.