मुंबई | कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रामध्ये ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली असून एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीमध्ये राज्यात झाली असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ मध्ये बोलताना दिली. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर राज्य सरकारने कशाप्रकारे राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले याचा लेखाजोखा देसाई यांनी आपल्या भाषणामधून मांडला.
जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असून लॉकडाउननंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करुन राज्याचं अर्थचक्र सुरु राहील यासंदर्भात काळजी घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच राज्यामध्ये डेटा सेंटर्स, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून झालेली रोजगार निर्मिती याबद्दलही देसाई यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये कोरोना कालावधीत ६० कंपन्यांनी एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच ही गुंतवणूक केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.७० टक्के उद्योगांना जमिनींचं वाटप करण्यात आलं असून यापैकी एकही करार बारगळणार नाही असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.