नवी दिल्ली | कोरोना संसर्गामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे. भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट आणि आता तिसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर जागतिक आरोग्य संघटनेने दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी जगाला मोठा इशारा दिला आहे. स्वामीनाथन यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं की, महासाथ संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवणं आपला मूर्खपणा असेल. कोरोना महासाथ कधी संपणार? याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही. महासाथ संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून अलर्टनेस कमी करणं आपला मूर्खपणा ठरेल, असं त्या म्हणाल्यात.
कोरोनाचा नवा वेरिएंट कधीही येऊ शकतो. आणि आपण पुन्हा त्याच परिस्थितीत अडकू शकतो. यासाठी आताच सावधान राहणं आवश्यक आहे. अशी आशा आहे की, २०२२ च्या शेवटपर्यंत आम्ही योग्य स्थितीत येऊ, असंही त्यांनी सांगितलं. देशातील प्राणघातक कोरोना व्हायरस साथीच्या रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना व्हायरसचे ५० हजार ४०७ नवीन रुग्ण आढळले असून ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे.