नवी दिल्ली | राज्यात महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेले काँग्रेस आमदार आघाडीवर नाराज असल्याचे बोलले जात होते. अशातच काँग्रेस आमदारांनी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार, दिल्ली दौऱ्यावर असताना मंगळवारी काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील आमदारांशी जवळपास तासभर चर्चा केली. या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी राज्यातील मंत्र्यांची तक्रार केली असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील अनेक काँग्रेस आमदारांनी पक्षप्रमुखांपुढे राज्यातील काही मंत्र्यांची तक्रार केली आहे. किमान समान कार्यक्रम ठरला, पण त्यानुसार कामकाज होत नसल्याची तक्रारही आमदारांनी केली. काँग्रेस आमदारांना निधी मिळत नाही. मंत्री फक्त आपल्या मतदार संघासाठी निधी घेतात इतर काँग्रेस आमदारांना वाऱ्यावर सोडतात. त्यावर, किमान समान कार्यक्रमानुसारच कामकाज झालं पाहिजे, अशी तंबीच सोनिय गांधींनी दिल्याचे समजते.
सोनिया गांधींनी सर्वच आमदारांची वैयक्तीक संवाद साधला. राज्यातील विकासनिधी हा सर्वांना समान मिळायला हवा, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. त्यांना भेटून सर्वच आमदारांना आनंद झाल्याचे काँग्रेस नेते सुरेश धोनोरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासमवेतही महत्त्वाची बैठक झाल्याचे ते म्हणाले.