कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागच्या मार्च महिन्यापासून सामान्य नागरिकांसही लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. कालांतराने अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी लोकलची सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातच मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मनसेने वेळोवेळी केली होती. त्यानंतर आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बसला प्रचंड वेळ लागतो गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण होणार नाही, अशी टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. मला खात्री आहे आपण हे करू शकता, आमचा सीएम जगात भारी, अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिलं होतं. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लोकलबाबत निर्णय घेतला नाही.