मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचार उसळला होता. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. निवडणूक निकाला नंतर बंगालमध्ये हिंसा उसळली आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक बाब आहे, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे आहेत की बंगालाबाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतंय त्याचा शोध घ्या, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला डिवचले आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बिळात होते. ते पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतीकारक आहे. देशातील मनाची भावना या निकालात प्रतिबिंबीत झाली आहे. परंतु, या निकालानंतर बंगालमध्ये उसळलेली हिंसा चिंताजनक आहे. दोन्ही बाजूने शांतता राखली पाहिजे. केंद्राने आणि बंगालच्या सरकराने संयमाने राहावे लागेल. बंगालचा इतिहास रक्तरंजित आहे. हे खरे आहे. पण सर्वांनी देशाची परिस्थिती पाहावी.
आज देशभरातील कोरोनाची परिस्थिती ओळखून काम करावं. एकमेकांना धमक्या देणं थांबवावं, असं सांगतानाच हिंसा घडवणारे बंगालचे की बाहेरचे हे पाहावे लागेल. टाळी एका हाताने वाजत नाही. हिंसेला कोण चिथावणी देतोय याचा शोध घ्या, या हिंसेचा तपास झालाच पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच २०२०४ च्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले की, २०२४ची निवडणूक आम्ही एकत्र मिळवून लढवू. राहिला नेतृत्वाचा प्रश्न तर दिल्लीत बसून कोण नेतृत्व करेल हे पाहावं लागेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.