मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यातच आता वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिले आहे.
गुरुवारी २४ तासांत राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर २४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सर्वाधिक ८६४६ नवे रुग्ण मुंबईत आढळले असून राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ५३३ झाली असून त्यातील सर्वाधिक ६४,५९९ रुग्ण पुण्यात असून, मुंबईतील ५४,८०७ रुग्णांचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील, यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फाईल गेली आहे. आज संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.