मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात शेवटपर्यंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चेला ऊत आला होता. मात्र ऐनवेळी खासदार उदयनराजे भोसले यांना डावलून महाराष्ट्रातून चार जणांची केंद्रीय मंत्री पदावर वर्णी लावण्यात आली होती. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंचा अवमान केला आहे. भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमानच केला आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी भाजपावर टीका केली आहे.