रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरीचा स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. यासोबतच ठाकरे गटही विरोध करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या रिफायनरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून बारसू येथील जागा सुचवली होती असा गोव्यस्फोट शिंदे गटाने केला होता. तर दुसरीकडे शिवसेनसह भाजपचे नेते ठाकरे गटाला लक्ष्य करत आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याच मुद्दयावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही याबाबत भाष्य करत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची ही सवयच आहे. उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या ज्या प्रकल्पांना पहिला विरोध केला, काही काळानंतर तेच त्यांच्या समर्थनासाठी उतरले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्यादिवशी मोजली जाईल त्या दिवशी त्यांचे समर्थन मिळेल. उद्धव ठाकरेंना आपली किंमत वाढवायची असून चेकवरचे आकडे वाढवायचे आहेत त्यासाठी त्यांचे राज्यपालांना वगैरे भेटणार हे सर्व सुरू आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.ज्यादिवशी उद्धव ठाकरे यांचा आकडा वाढेल त्या दिवशी त्यांचा बारसु रिफायनरीला विरोध कमी होईल. मातोश्री एकचे दोन झाले आहेत, खर्च वाढलेला आहे. मुलांची लग्ने करायची आहेत म्हणून हे विरोध करायला लागतात अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे.