सावधान कोरोनाचा धोका वाढतोय: राज्यात 2813 तर देशात 7240 नवे कोरोना रुग्ण
मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत नव्या कोरोना (Corona) बाधितांच्या आकडेवारीने उच्चांकी नोंद केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नव्या 2, 813 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. त्यात आज या आकडेवारीने नवा टप्पा पार केला आहे. 2,813 नव्या रुग्णांपैकी 1,702 रूग्ण एकट्या मुंबईतील असल्याने येथील नागरिकांचीदेखील चिंता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात चोवीस तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.98 टक्क्यांवर नोंदवण्यात आले आहे. तर, राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 11, 571 इतक्या कोरानाच्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, मुंबईमध्ये सर्वाधिक 7,998 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर ठाण्यात 1,984 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे सात हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,31,97,522 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 5,24,723 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Maharashtra reports 2813 new #COVID19 cases, 1047 recoveries and one death in the last 24 hours. pic.twitter.com/2Alr6Jg48w
— ANI (@ANI) June 9, 2022
आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (9 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7,240 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा पाच लाखांवर पोहोचला आहे.
हिंदुस्तान टाईम्सनुसार, महाराष्ट्रातील सर्विलान्स अधिकारी आणि महामारी तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत कोरोनाचा पूर्णपणे नवीन प्रकार येत नाही तोपर्यंत चौथी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. सध्या वाढणारी कोरोना प्रकरणे ही तिसरी लाट आणणाऱ्या ओमायक्रॉनचे सर्व प्रकार आहेत.
पुढील काही आठवडे केसेस वाढतील, मात्र नंतर ते कमी होऊ लागतील. राज्य कोविड टास्क फोर्सचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी एचटीला दिलेल्या माहितीनुसार, सध्या बहुतेक प्रकरणे अतिशय सौम्य आहेत. याला चौथी लाट म्हणणं खूप घाईचे आहे.