बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपा यांच्यात शीतयुद्ध पेटलेले दिसून येत आहे. त्यातच बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ३५ वर्षांच्या भाजपच्या वर्चस्वाला आव्हान दिले. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं.
मात्र या निवडणुकीत एकीकरण समितीचा दणाणून पराभव झाला होता तसेच मिळवलेल्या या विजयानंतर भाजपने आनंद व्यक्त केला. पण मराठी माणसाच्या पराभवानंतर आनंद व्यक्त करणारी तीच जमात आहे जी शिवाजी महाराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करत होती, असा संदर्भ देत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप पुढाऱ्यांवर आजच्या सामना अग्रलेखातून हल्ला चढवला आहे.
“औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील”, अशा शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे, असं सांगताना एक निवडणूक हरलो म्हणून लढा संपत नाही. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील, मराठी एकजूट पुन्हा उसळून समोर येईल”, असंही राऊत म्हणालेत.
मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱ्हाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱ्हाटी भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला.