नवी दिल्ली | विधानसभेत पाठवण्यात येणाऱ्या १२ आमदारांचा मुद्दा वर्षभरापासून राज्यात चांगलाच गाजताना दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून आक्रमक झालेले दिसत आहे. १२ आमदारांच्या नियुक्त्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्यानं ठाकरे सरकारने थेट न्यायालयाचे दरवाजे खटखटले होते. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी मोठं भाष्य करत राज्यपालांना झापले होते. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी यांनी थेट दिल्ली गाठत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तातडीने त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येतं आहे. अमित शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी याचं स्वागत केलं आणि या दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याचं देखील समोर येतंय.
१२ आमदारांचा मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठानं या प्रकरणाचा निर्णय दिला. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नेमणूक करण्यास बराच उशिर झाला असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. राज्याच्या सुव्यवस्थेसाठी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय असायला हवा असंही न्यायालयाने म्हटलं होतं.