पुन्हा एकदा शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला असून तुमच्यात हिंदुत्व शिल्लक असेल, तर महाराष्ट्रात जे चाललंय, ते आम्हाला पसंत नाही, असे जाहीर करा आणि सरकारमधून बाहेर पडा, असे सांगत बाळासाहेबांचा पक्ष आणि नाव पाहिजे असणाऱ्या गद्दार आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले.
उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवावी, असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आमचा जुना मित्रपक्ष आहे. जुन्या मित्रपक्षाला सोबत घेऊन आम्ही याआधीच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत आणि इथून पुढं येणाऱ्या सगळ्या निवडणुका देखील आम्ही भाजपसोबतच लढणार असल्याचंही प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील उर्वरित आमदारही प्रचंड अस्वस्थ असून काही वैयक्तिक कारणामुळे ते शिवसेनेत थांबून आहेत. त्यांची ही अस्वस्थता केव्हा संपेल हे सांगता येणार नाही, असं म्हणत सर्वच्या सर्व आमदार रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना येऊन भेटतात, असं विधान करत खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.