शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. आपण एकनाथ शिंदेंना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. ते ऐकतील, असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घ्या, अशी विनंती केली आहे.
पण भाजपसोबत कसं जायचं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांसमोर उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार खासदारांना काय म्हणाले? “तुमचं काही नाही, माझं काही नाही तर जायचं कशाला? आता बोलत आहेत की, भाजपसोबत चला. जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का? मग आता भाजपसोबत कसं जायचं? आपण एकनाथ शिंदेंना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते माझं ऐकतील हा मला पूर्ण विश्वास आहे. ते लवकरच आपल्यामध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्यासोबत आहेत”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या आमदारांची व्यवस्था आता लोअर परळमधील सेंट रिजीस हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आमदारांमध्ये मुंबई बाहेरील आमदार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर संभाषण दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर हे गुजरातच्या सूरत शहरात शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते.
शिंदे सूरतमधील ली-मेरिडीअन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पंधरा मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोधात घोषणाबाजी केली जात असल्याने शिंदे भावूक झाले.