मुंबई | अधिवेशनाच्या पाहिलीत दिवशी स्बगृहात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुफान राडा झालेला पाहायला मिळाला होता. या राड्यावरून भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. या निलंबनावरून भाजपने घणाघाती टीका ठाकरे सरकारवर केली होती.
त्यातच आता आमदारांच्या निलंबनानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला इशाराच दिला आहे.
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेतलं नाही तर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी आज नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन दिलं. त्याचबरोबर राज्यात ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी सरकारमधील काही झारीतले शुक्राचार्य कारणीभूत आहे, असा घणाघातही बावनकुळे यांनी केला आहे.