मुंबई : पुन्हा एकदा शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला जळगाव महानगर पालिका निवडणुकीत धक्का देत पराभवाची धूळ चारली आहे. शिवसेना उमेदवार जयश्री महाजन या विजयी होऊन महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला आहे.
या विजयनानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विजयासंदर्भात घडलेल्या घडामोडी संदर्भात भाष्य केले होते. १० दिवसांपूर्वी याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसते आवाहन केले, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली असे भाष्य खडसे यांनी केले होते.
पुढे महाजन यांचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, भाजपाच्या स्थानिक नेतृत्वामध्ये गर्विष्ठपणा आहे. नगरसेवकांना तुच्छ लेखणं, स्थानिक मागण्यांकडे दुर्लक्ष करणं हे होत होतं. त्यामुळे नगरसेवकांना फार आग्रह करावाच लागला नाही. यापैकी बरेच जण महिन्याभरापासून माझ्यामागे फिरत होते. गिरीश महाजनांविषयी प्रचंड नाराजी होती असे विधान त्यांनी केले होते.