नागपूर: एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतील तब्बल 50 आमदारांचा गट घेऊन सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांना फोडून बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. त्यांच्या या कार्याला ते उठाव मानतात. विशेष म्हणजे आपल्या या उठावाची दखल थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी घेतल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. ते नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महासत्तांतर’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबतचं विधान केलं आहे.
माझ्याकडे गेल्या एक महिन्यापूर्वी एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे राहतो. तो खरंतर भारतीय आहे. पण त्यांच्याकडे तो आहे. त्याचा नातेवाईक गेला होता. त्याला बोलतो हु इज एकनाथ शिंदे, कोण आहे, केवढं काम करतो, कधी खातो, कधी झोपतो”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
दरम्यान, “काही लोकांना वाटलं आम्ही संपलो. पण तसं नाही”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असंही ते यावेळी म्हणाले. तसेच “सरकार कुठल्याही सूड भावनेने काम करत नाहीय”, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.
“राजकारणात विश्वास आणि कमिटमेंटला फार महत्त्व असतं. 50 आमदार एकत्र येणं सोपं नाहीय. त्यापैकी 9 मंत्री होते. ते सत्ता सोडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका त्यांनी घेतली. हेच बलस्थान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.