महाराष्ट्र सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.महाराष्ट्रामधील राजकीय अस्थिरतेवरुन शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
तसेच भाजप ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात. ही प्रवृत्ती वेगानं वाढत आहे. देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा काळाची पावले ओळखा असेही शेट्टी यावर म्हणाले. एखादा पक्ष किंवा संघटना उभा करण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे ज्याचं त्यालाच माहित आहे. अशा पद्धतीनं एखाद्या पक्षाची वाताहत होतेय त्यामुळं वाईट वाटत असल्याचे शेट्टी म्हणाले.
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. या सर्वामागे भाजप असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.