विधान परिषदेसाठी पंकजा यांचं नाव पुन्हा एकदा डावलण्यात आलं. राज्यसभा पाठोपाठ विधान परिषेदेलाही डावलण्यात आल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ओबीसी समाजात ही या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष आहे. यातून मुंडे समर्थकांनी औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यालयावर निषेद व्यक्त करत हल्ला केला होता. या सर्व वादावर आता मावळ विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले, “पंकजा यांची लोकप्रियता आणि नेतृत्व क्षमतेमुळे भाजपचे काही नेते धास्तावले असून या भीतीतून त्यांना वारंवार डावलले जात आहे.” सुनील शेळके यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय पटलावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सुनील शेळके हे पूर्वाश्रमीचे भाजपा गोपीनाथ मुंडे समर्थक राहिलेले आहेत, म्हणून त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जाते. सुनील शेळके यांचा रोख भाजपमधल्या कोणत्या नेत्यांवर आहे, याची आता सगळीकडे रंगलेली आहे.
भाजपच्या काही नेत्यांना पंकजां मुंडेंची भीती वाटत असल्यामुळेच त्यांची वारंवार संधी नाकारली आहे. पंकजांचे राजकीय पुर्नवसन होऊ द्यायचे नाही, ही काही नेत्यांची खेळी पुन्हा स्पष्ट झाली आहे. विधान परिषदेची संधी मिळाल्यास राज्याच्या राजकारणात त्या पुन्हा सक्रिय होतील. आपला ठसा उमटवतील. तो आपल्या राजकीय अस्तित्वाला धोका ठरु शकतो. ही भीती वाटत असल्यामुळेच भाजपचे काही नेते त्यांना वारंवार डावलून राजकारणातील नवे डाव आखण्याचे प्रयत्न करीत असल्याचे मागील काही काळापासून दिसून येत आहे, असे सुनील शेळके म्हणाले आहेत.