कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला होता. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. मात्र या दौऱ्यावेळी आपली व्यथा मांडणाऱ्या एका व्यापारी महिलेबरोबर आमदार भास्कर जाधव गैरवर्तन केलं.
या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच यावरून नेटकऱ्यांनी भास्कर जाधवांवर मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरूवात केली आहे. त्यातच आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील भास्कर जाधव यांच्यावर आक्रमकपणे टीका केली आहे.
मी सांगितलं होतं की, हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासूर आहे. तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज महिलांवर हात उगारताना दिसला, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्यामुळे विधानसभेच्या आमच्या १२ आमदारांचं निलंबन करणं हे कोणत्या नैतिकतेत बसतं?, असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
कोकणातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करताना एक महिला त्याठिकाणी होती. तिने उद्धव ठाकरे यांच्याकडे मदत मागितली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी सोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेवर हात उगारला होता.