मुंबई | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कौतुक केलं. पंढरपूर पालखीमार्गाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तब्येत ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी गडकरींचं कौतुक केलं.
मुख्यमंत्री म्हणाले की, नितीन गडकरी यांनी पुण्याईचं काम हाती घेतलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून काही अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत. पालखीमार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे.
यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे, हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ‘वारीचे दर्शन मी स्वत: घेतले. मी काही वर्षांपूर्वी वारीची एरिअल फोटोग्राफी केली. यामाध्यमातून मी भक्तीसागर पाहिला. विठु माऊलीचे विराट दर्शन मी यात पाहिले. अनेक ठिकाणाहून पालख्या पंढरपूरला येतात. हे दृष्य पाहून अनेक नद्या सागराकडे धावत येत असं वाटतं, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ‘वाखरी हे या पालख्यांची एकत्र येण्याची जागा.
त्यामुळे वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठा करण्याचा निर्णय खूप महत्वाचा आणि मोठा आहे, तिथे सर्व पालख्या एकत्र येऊन भक्तीसागर निर्माण होतो. ऐहिक सुखाच्या मागे न लागता त्यापलीकडे जाऊन देहभान हरपून जाणारे वारकरी जेंव्हा या मार्गावरून चालत असतात तेंव्हा भक्तीसागराच्या या पाण्याला विठुनामाचा नाद असतो. भक्तीमार्गावरून आजवर आपल्या देशाची वाटचाल झाली आहे. ही वाटचाल आणखी सहज व्हावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नितीन गडकरी यांना धन्यवाद, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.