मुंबई | दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करण्यात व्यस्त आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. त्यासोबतच भाजप आमदार नितेश राणे यांनीही दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर ट्विट केलं आहे.
याच दरम्यान आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हा जगू द्या अशी हात जोडून विनंतीच त्यांनी केली आहे.
राजकारणामुळे जगणं मुश्किल झालंय दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी दिशाच्या आईने म्हटलं, राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. जगू दिलं जात नाहीये. आम्हाला आता त्रास देऊ नका, आम्हाला जगू द्या. राजकीय नेते आमच्या मुलीला बदनाम करत आहेत. ती सोडून गेलीय…. यांना आम्हाला बदनाम करण्याचा काय अधिकार आहे? असा सवालही उपस्थित केला.
महिला आयोगाकडे लेखी तक्रार आम्ही या संदर्भात महिला आयोगांना लेखी तक्रार केली आहे. आम्हाला आता पुढे त्रास देऊ नका असं आम्ही पत्रात म्हटलं आहे. आम्ही विनंती करतो की, आम्हाला त्रास देऊ नका. आमच्या एकुलत्या एक मुलीला आम्ही गमावलं आहे. तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या असंही दिशाच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे. … तर आम्ही जगणार नाही जे दावे केले जात आहेत तसं काहीही झालेलं नाहीये माझ्या मुलीला विनाकारण बदनाम केलं जात आहे असा आरोपच राजकीय पुढाऱ्यांवर लगावला आहे.