आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर भाजप पक्षाकडून ‘मिशन बारामती’ राबवले जात आहे.यासाठी भाजप पक्षाच्या नेत्या आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचा दौरा केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. बारामतीला घेरणं इतकं सोप्प नाही. प्रत्येक जण आपल्या परीने काम करत असतो. असे कितीतरी येतात, कितीतरी जातात. शेवटी मतदार काय निर्णय घेतात त्यावर ते अवलंबून असते. त्यामुळे भाजप नेत्यांच्या वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे अजितदादा म्हणाले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे वक्तव्य पाटील यांनी केले. यावरून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू होते हे दिसते. फक्त त्यांना यश मिळण्यासाठी अडीच वर्षं थांबावे लागले,असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.