राज्यामध्ये सध्या निवडणुकांचं वारं घुमू लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या खेळी रंगलेल्या पाहायला मिळतं आहेत. भाजप पक्षाकडून बारामतीला टार्गेट करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. बारामतीत भाजपाकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता. अशातच यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
पाटील म्हणाले की, गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे. चंद्रकांता पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येकजण यश मिळावं यासाठीच प्रयत्न करत असतो. गणरायकडे काय मागितलं असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि सुरक्षा सर्वसामान्यांना प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.