हिंदुत्व आणि निधीवाटपाच्या मुद्यावरून बंडखोरी करणाऱया आमदारांचे हिंदुत्व सपशेल खोटे-बहाणेबाज असून शिवसेनेचेच हिंदुत्व खरे आहे. बंडखोरी करणाऱ्या तब्बल १६ आमदारांना ‘ईडी’च्या कारवाईची भीती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हिंदुत्वाच्या गोष्टी फक्त तोंडी लावायच्या आहेत असे सांगतानाच, बंडखोर आमदार लालसा, महत्त्वाकांक्षा आणि आमिषामुळेच पळाले असल्याचा घणाघात शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांनी आज केला.
भाजपने बेइनामी केली नसती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. तेव्हा भाजपलाच शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते. 2019 ला भाजपने रोखले नसते तर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले असते, असे प्रतिपादनही राऊत यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना केले. तीन पक्ष एकत्र आल्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.
तसेच कोरोनासारख्या भयंकर संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि पक्षाची दुहेरी जबाबदारी सांभाळली. ते आमदारांशी संवाद साधत नाहीत असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिघेंच्या नावाने राजकारण करू नका, असेही त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावले होते.
शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या बंडखोर आमदारांना शिवसेनेने मेहनतीने मोठे केले. त्यामुळे जनता या बंडखोर आमदारांना पुन्हा मत देणार नाही. ज्या आमदारांविरोधात किरीट सोमय्यांनी दररोज पत्रकार परिषदा घेतल्या त्या आमदारांवरील केसेस भाजपने २४ तासांत क्लिअर केल्या असेही राऊत यांनी सांगितले.